*”कुसुमाग्रज जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेत ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ उत्साहात”*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चारी नंबर १५, राहाता जि.-अहिल्यानगर येथे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिमित्त ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात राबविण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे. मराठी भाषेबद्दल अभिमान जागृत करणे आणि महान साहित्यिकांच्या कार्याची ओळख करून देणे हा होता.
या प्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. हनुमंत माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुस्तक व ग्रंथ वाचनाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. नियमित वाचनामुळे विचारशक्ती विकसित होते. व्यक्तिमत्त्व घडते आणि समाजाविषयी सजग दृष्टी निर्माण होते. असे त्यांनी सांगितले. तसेच कुसुमाग्रजांच्या साहित्यिक कार्याचा परामर्श घेत त्यांच्या काव्यलेखनातील ओज, संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव यांचा गौरवपूर्वक उल्लेख केला.
कुसुमाग्रज हे केवळ कवी नव्हते. तर नाटककार, कथाकार, कादंबरीकार आणि प्रखर विचारवंत होते. त्यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाने स्वातंत्र्यलढ्याच्या काळात तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्वाला प्रज्वलित केली. ‘नटसम्राट’ हे त्यांचे अजरामर नाटक मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरले असून आजही ते रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांच्या साहित्यामध्ये सामाजिक अन्यायाविरुद्धचा ठाम आवाज, मानवता, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांसारख्या मूल्यांचा प्रभावी पुरस्कार आढळतो.
मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये कुसुमाग्रजांचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या प्रभावी, ओजस्वी आणि भावस्पर्शी लेखनामुळे मराठी साहित्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही संपूर्ण मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब आहे.
या वाचन अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी. विचारांची प्रगल्भता वाढावी आणि समाजभान जागृत व्हावे. हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून महान साहित्यिकांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापक श्री. मच्छिंद्र वडणे, श्रीम. उषादेवी थोरात मॅडम, श्रीम. जानका गोर्डे मॅडम,श्री. सुरेश भिंगारदिवे, श्री. बाजीराव बनसोडे, श्री.संदीप धिवर,श्री.अमोल तुपविहीरे तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य-श्री. संदीप सापिके व सदस्या-श्रीम. पठाण, श्रीम. सय्यद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















