शिर्डी (प्रतिनिधी) – येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री. अविनाश अशोक शिंदे व श्री. करणभाऊ गायकर यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या उपोषणामुळे परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले आहे.
उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये २६ जानेवारी रोजी सर्वानुमते मंजूर झालेल्या ग्रामसभा ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करावी, तसेच पिंपळवाडी येथील वीटभट्टीवर १५ वर्षीय बालमजुराच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, यांचा समावेश आहे.
तसेच, पिंपळवाडी गावातील बेकायदेशीर वीटभट्ट्यांमुळे वाढणारे प्रदूषण, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमार्फत बालमजुरीविरोधात ठोस धोरण राबवून सर्व वीटभट्ट्यांचे सर्वेक्षण करून योग्य ती कारवाई करावी, अशीही विनंती उपोषणकर्त्यांनी केली आहे.
यासोबतच, संबंधित प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व गावातील सर्व वीटभट्ट्यांचा पंचनामा करून त्या शासनाच्या ताब्यात घ्याव्यात, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. तसेच २६ जानेवारीच्या ग्रामसभा ठरावाला न जुमानणाऱ्या वीटभट्टी मालकांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, छावा क्रांतिवीर सेना, महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित असून मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा अविनाश शिंदे यांनी दिला आहे.





















