
राहाता (प्रतिनीधी) ः- पावसाळ्यात निळवंडे धरणाचे ओव्हर फ्लो चे पाणी कातनाल्याद्वारे थेट पुणतांब्या पर्यत जाण्यास सुरवात झाली. जलसपंदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा एका अर्थाने प्रवरा ते गोदावरी असा नदिजोड प्रकल्प साकार झाला आहे. त्यामुळे त्या भागातील जिरायत गावे बागायत होऊ लागली. त्याचबरोबर राहाता परिसरातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली. असे प्रतिपादन नगराध्यक्ष डाॅ.स्वाधिन गाडेकर यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा प्रारंभ झाला. राहाता तालुक्यात या उपक्रमाची सुरुवात आज पंचायत समितीच्या सभागृहात झाली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, जलसंपदा विभागाचे अभियंता प्रदीप हापसे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आदि उपस्थित होते. आज पासून तालुक्यात येत्या ३० एप्रिल हा कृती पंधरवडा राबवीला जाईल.
डाॅ.गाडेकर म्हणाले, जलसंवर्धनाबरोबरच सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी ओढे,नाले अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प जलसंपदा विभागाने केला . प्रत्येक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून, जलसंपदा विभागाचे प्रशासन अधिक गतिमान करण्याचा निर्धार या निमीत्ताने केला जाईल. या निमीत्ताने गोदा ते नर्मदा जलदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
अभियंता प्रदीप हापसे म्हणाले, जलसंपदा विभागाने दोन वर्षांत प्रशासकीय स्तरावर पारदर्शकता आणि तंत्रज्ञान याची योग्य सांगड घातली. गतिमान निर्णय घेतल्यामुळे प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या कामाला चालना मिळाली. प्रशासकीय स्तरावर रचनात्मक बदलही होत आहेत. कामेनिर्धारित वेळेत पूर्ण होत आहेत.
——————————-चौकट————————————
डाॅ.स्वाधिन गाडेकर(नगराध्यक्ष, राहाता) ः- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा आजपासून सुरू झाला. त्यात लोकसहभाग वाढावा यासाठी अधिकारी आणि पदाधिका-यांनी सक्रीय होणे गरजेचे आहे.




















