


पीक विमा कंपन्यांनी तातडीने पिकांची पाहणी करावी – जाधव
पुणतांबा (वार्ताहर) – परिसरात अतिवृष्टी आणि गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे परिसरातील सोयाबीन, मका तसेच सर्व खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान झालेले आहे. चक्रीवादळामुळे परिसरातील उसाचे संपूर्ण क्षेत्र भूईसपाट झाले आहे. ज्यांनी पिक विमा घेतलेला आहे, त्या शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज घेण्यासाठी पिक विमा कंपन्यांनी तातडीने पिकांची पाहणी सुरू करावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश जाधव यांनी केली.
परिसरात २७ सप्टेंबर रोजी रात्री ६ इंच पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे परिसरातील अनेक बंधारे फुटले, त्यामुळे शिवारात सर्वत्र पाणी साचले होते. सर्वच पिके ४ ते ५ दिवस पाण्यात होती; काही पिकांमध्ये आजही पाणी वाहत आहे. त्यातच गोदावरी नदीला महापूर आला होता, ज्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात
नुकसान झाले आहे. सलगच्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.यावर उपाय म्हणून नुकसानग्ग्रस्त पीक विमा धारकांचे पाहणी करून त्यांना योग्य विमा भरपाई मिळावी यासाठी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे या पावसामुळे अनेकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.राज्य सरकारने सरसकट पिकांचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाण्याची शक्यता आहे. विमा कंपन्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पाहणी सुरू करण्याची आवश्यकता आहे.
पिक विम्याबाबत विमा कंपन्यांनी चालू वर्षी नियमावली बदलली आहे, त्यामुळे पिक विम्यासाठी चालू वर्षी शेतकऱ्यांनी अत्यंत अल्प प्रीमियम दिला आहे. पिकांची
सोंगणी आणि खळे करताना पिकांचे नेमके किती नुकसान झाले, नैसर्गिक आपत्तीमुळे प्रति एकर किती उत्पन्न घटले याबाबत प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली जाणार आहे. असे असले तरी आता विशेष बाब म्हणून तातडीने पाहणी करणे गरजेचे आहे. विमा कंपनीने चालढकल करून पिकांची पाहणी करण्याचे जाणीवपूर्वक टाळले तर मनसेच्या वतीने धडक आंदोलन करण्याचा इशारा श्री. गणेश जाधव यांनी दिला आहे.




















