अस्तगाव चे नाव महाराष्ट्रात चमकले! जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शांताराम शेळके यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील निस्सीम सेवा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शिक्षकाचा गौरव म्हणजे समाजाचा गौरव असतो .जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगाव मराठी तालुका राहाता या शाळेचे जिल्हा पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक शांताराम शेळके यांना सन 2025 -26 सालचा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ध्येय फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे आयोजित एका भव्य सोहळ्यात हा बहुमान त्यांना बहाल करण्यात आला. पुणे निगडी येथील ग दि माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या एज्युकेशन आयकॉन्स समिट 2026 मध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या शुभहस्ते शेळके सरांना सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी उपस्थित शिक्षण तज्ञांच्या हस्ते शेळके सरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधून अत्यंत काटेकोर निवड प्रक्रियेद्वारे या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. राहता तालुक्यातील शांताराम शेळके यांनी आपल्या उत्कृष्ट अध्यापन पद्धती , विद्यार्थ्यांमधील शिस्त आणि नैतिक मूल्यांची जोपासना ,तसेच राबवलेले नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रकल्प या जोरावर या पुरस्कारावर आपले नाव कोरले. शांताराम शेळके सर केवळ वर्गातील अध्यापनापुरते मर्यादित न राहता ,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती

निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक जनजागृतीसाठी सतत कार्यरत असतात .त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि शैक्षणिक गुणवत्तेची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे .या यशाबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील साहेब, राहाता तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री राजेश पावशे साहेब व विस्तार अधिकारी श्री भाऊसाहेब घोरपडे साहेब ,तसेच अस्तगावचे केंद्रप्रमुख श्री ज्ञानेश्वर जाधव साहेब ,मुख्याध्यापक श्री लहानुभाऊ सहाणे सर ,श्री अरुण मोकळ सर तसेच सहकारी शिक्षक ,विद्यार्थी ,पालक ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य ,सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य आणि शिक्षण प्रेमी नागरिक यांनी सरांचे अभिनंदन केले. त्यांच्या या पुरस्कारामुळे तालुक्याच्या शैक्षणिक शिरपेचा त मानाचा तुरा रोवला गेला.




















