शिर्डीत सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात ४१ जोडपी विवाहबंधनात

साईभूमीत शाही विवाह सोहळा; २५ वर्षांची सामाजिक परंपरा ठरली देशासाठी आदर्श
शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या “सबका मालिक एक” या संदेशाचे जिवंत रूप मानला जाणारा शिर्डीतील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करताना पुन्हा एकदा सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश देऊन गेला. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात यंदा ४१ जोडपी एकाच मंडपात विवाहबंधनात अडकली. विशेष म्हणजे या प्रवासात हजारो वधूंचे कन्यादान करून कैलासबापू कोते आणि सुमित्राताई कोते यांनी देशात एक वेगळा सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट, शिर्डी ग्रामस्थ आणि कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून हा सोहळा उत्साहात पार पडला. समाजातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना विवाहाचा आर्थिक ताण कमी व्हावा या उद्देशाने २००२ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाने आज राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. अवघ्या सव्वा रुपयांत विवाह करून देण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणत या सोहळ्याने अनेक कुटुंबांना दिलासा दिला आहे.

यंदाच्या सोहळ्यात नववधू-वरांसाठी पारंपरिक पद्धतीने घोडे आणि बग्गीतून शाही मिरवणूक काढण्यात आली. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरातून वाजतगाजत मिरवणूक विवाहस्थळी पोहोचली. या मिरवणुकीत शिर्डी ग्रामस्थ, भाविक आणि वऱ्हाडी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. साईनगरीत दिवसभर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
या सोहळ्याची खरी ओळख म्हणजे सर्वधर्म समभाव. एकाच मंडपात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन तसेच आंतरजातीय विवाह पार पडले. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि नेपाळमधूनही जोडपी येथे विवाहासाठी येत असल्याने या उपक्रमाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
या सोहळ्याला उपस्थित राहून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोते दाम्पत्याच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “शिर्डीत गेली २५ वर्षे सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून माणुसकीचा संदेश दिला जात आहे. विवाहातील वाढता बडेजाव आणि पैशांची उधळपट्टी थांबवून समाजाने साधेपणाने विवाह करण्याची गरज आहे. कोते दाम्पत्याने उभा केलेला हा आदर्श समाजासाठी दिशादर्शक आहे.”
या उपक्रमाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे विवाहानंतर पहिली कन्या झाल्यास तिच्या नावे ११ हजार रुपयांची ठेव केली जाते. मुलगी जन्माला आल्याचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न समाजात विशेष कौतुकाचा विषय ठरला आहे. या सामाजिक कार्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडननेही घेतली आहे.
कैलासबापू कोते यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “गरीब कुटुंबातील मुलीचे लग्न ओझे ठरू नये, या भावनेतून हा प्रवास सुरू झाला. आज या उपक्रमाने परंपरेचे रूप घेतले असून ही सेवा साईबाबांच्या कृपेने पुढेही सुरू राहील.”
कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत योगराज कोते, धनराज कोते, भगीरथ होन आणि अरविंद कोते यांनी केले. यावेळी साधुसंतांसह खासदार भाऊसाहेब वाकचौरे,रमेशगीरी महाराज, विष्णूगीरी महाराज, सुधीर महाराज, अरूणगीरी महाराज, काशिकानंद महाराज, सोमनाथ महाराज, डॉ. कौय्युब शेख, नगराध्यक्षा जयश्री थोरात, विजयराव कोते, कमलाकर कोते, नितीन औताडे, ज्ञानेश्वर गोंदकर, नितीन कोते, अनिल कामरा, शफीक शेख , अलका शेजवळ,निलेश कोते, विलास कोते, राजेंद्र कोते, मुख्याधिकारी सतिश दिघे, पी आय रणजीत गलांडे, गोपिनाथ गोंदकर, दादाभाउ गोंदकर, आदी मान्यवर उपस्थित होते.




















