वारकरी कीर्तनाच्या नावाखाली नथुरामी विचारांची घुसखोरी – महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही- प्रभावती घोगरे
वारकरी कीर्तनाच्या पवित्र परंपरेच्या नावाखाली नथुरामी विचारांचा प्रचार महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रभावती जनार्दन घोगरे यांनी दिला आहे. स्वतःला कीर्तनकार म्हणवणाऱ्या संग्राम भंडारे या व्यक्तीने अलीकडे केलेल्या भडकावू आणि द्वेषपूर्ण विधानामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वक्तव्याविरोधात राहाता पोलीस ठाण्यात घोगरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रभावती घोगरे म्हणाल्या,
“वारकरी परंपरा ही संतांची, भक्तीची आणि समाज ऐक्याची परंपरा आहे. या परंपरेचा आधार घेऊन जातीयवाद, हिंसा व नथुरामी विचारांचा प्रचार करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही. संग्राम भंडारे यांनी केलेले वक्तव्य हे केवळ ज्येष्ठ नेते मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध धमकी नसून, लोकशाहीच्या मुल्यांवर आणि महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणावर थेट हल्ला आहे. अशा प्रवृत्ती समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करीत असून, त्यांना आळा घालणे हे प्रशासनाचे पहिले कर्तव्य आहे.”
संग्राम भंडारे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी. अशी मागणी यावेळी घोगरे यांनी केली.तसेच
“मा. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये सहकार, शिक्षण, शेती, आरोग्य आणि सामाजिक ऐक्य यांचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या विरोधात धमकी देणे म्हणजे हजारो शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि सामान्य जनतेच्या विश्वासाला तडा देणे होय. काँग्रेस पक्ष हा लोकशाहीचा रक्षक असून आम्ही भीतीला झुकणार नाही. महाराष्ट्रात धमक्या, हिंसा आणि विषारी भाषणांना कधीच स्थान मिळणार नाही. लोकशाही व सामाजिक ऐक्याच्या रक्षणासाठी आम्ही शेवटपर्यंत ठामपणे लढा देऊ.”
असही त्यांनी म्हटलं.निवेदन देताना राहाता तालुक्यातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वातावरण घोषणाबाजीने दणाणून गेले होते.
या प्रसंगी ॲड पंकज लोंढे,गणेश सहकारी साखर कारखान्याचे व्हा.विजयराव दंडवते, शिर्डी संस्थांचे विश्वस्त अविनाश दंडवते, संचालक भगवानराव टिळेकर, शिवसेना नेते धनंजय गाडेकर, राष्ट्रवादीचे शशिकांत लोळगे, विक्रांत दंडवते, संपत हिंगे, बाबासाहेब डांगे, अनिल बोठे, शिमोन जगताप, ज्ञानेश्वर वर्पे, उत्तमराव घोरपडे, अमृत गायके, बाळासाहेब गिधाड, राजेंद्र निर्मळ, उत्तमराव मते, रंजीत बोठे, अमोल आरणे, अक्षय गोर्डे, राहुल विखे, अनिश शेख, संतोष अनाप, सचिन उर्फ मुन्ना आहेर, अरुण घोगरे, शामराव घोगरे, राजेंद्र आग्रे, सागर कडू यांच्यासह महिला प्रतिनिधी वर्षाताई घोगरे तसेच लोणी खुर्द ग्रामपंचायत सदस्या आशा आहेर यांसह पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमुखाने लोकशाही व सामाजिक ऐक्याच्या रक्षणासाठी ठाम लढा देण्याचा संकल्प केला.
सचिन चौगुले, उत्तमराव घोरपडे व शिमोन जगताप यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.




















