
श्रीरामपूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण रविवारी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
नेवासा-संगमनेर मार्गावरील भाजी मंडईसमोर उभारण्यात आलेल्या या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी 1 कोटी 31 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसर ‘जय शिवराय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी श्रीरामपूर शहर, तालुका तसेच जिल्ह्यातील असंख्य शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
40 वर्षांचा संघर्ष संपला : “श्रीरामपूर तालुक्यातील नागरिक आणि शिवप्रेमींचा 40 वर्षांचा संघर्ष अखेर आज संपला आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं भव्य अनावरण करण्यात आलं. या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होत आलं, हे माझं भाग्य समजतो”, अशी भावना माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी यावेळी व्यक्त केली.




















