दारूच्या नशेत पोटच्या मुलाकडून बापाची निर्घृण हत्या; राहात्यात संतापाची लाट
राहाता शहराला हादरवून सोडणारी आणि समाजमनाला अंतर्मुख करणारी एक हृदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घोलप मंगल कार्यालयाच्या मागील परिसरात घडली. दारूच्या नशेत बुडालेल्या एका मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची फरशीने ठेचून निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात संताप, हळहळ आणि सामाजिक चिंतनाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन उत्तम खैरे हा दारूच्या नशेत घरी परतला होता. यावेळी त्याचे वडील उत्तम लक्ष्मण खैरे यांनी त्याला समज देत, ‘तू काही कामधंदा करत नाहीस, दिवसभर दारू पिऊन फिरत असतोस’, असे सुनावले. मात्र या शब्दांचा राग मनात धरत आरोपीने संतापाच्या भरात वडिलांच्या डोक्यात फरशी टाकून त्यांची जागीच हत्या केली. क्षणिक संताप, व्यसनाची नशा आणि विवेकशून्यता यांचे हे भयावह रूप पाहून परिसर हादरून गेला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक शरद लेंडे, पोलिस उपनिरीक्षक कोमल कुमावत, पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश कारभारी गडाख यांच्यासह पथकाने त्वरित कारवाई केली. आरोपीविरुद्ध पुंडलिक किसन पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. १४७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) व ११५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोमल कुमावत करत आहेत.
ही घटना केवळ एका कुटुंबाचा विनाश नाही, तर समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेचे आणि कौटुंबिक नात्यांच्या तुटणाऱ्या धाग्यांचे गंभीर चित्र समोर आणते. दारूचे व्यसन केवळ व्यक्तीला नाही, तर संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकते, याचा हा जिवंत पुरावा आहे. आज पालकांना आपल्या लेकरांपासूनच जीवाचा धोका निर्माण होणे, ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी चिंतेची बाब आहे.
समाजाने आता केवळ अशा घटनांवर हळहळ व्यक्त करून थांबून चालणार नाही; व्यसनमुक्ती, कौटुंबिक संवाद आणि युवकांना रोजगाराच्या दिशेने प्रवृत्त करण्यासाठी ठोस सामाजिक चळवळ उभारण्याची गरज आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटना पुन्हा पुन्हा समाजासमोर उभ्या राहतील, आणि प्रत्येक वेळी मरण पावेल ते केवळ एखादे व्यक्तिमत्त्व नव्हे तर आपल्या समाजाचे नैतिक भान. अशी चर्चा यावेळी नागरिक करत होते.




















