
भारतीय संविधानामुळेच आपला देश एकसंघ
राधाकृष्ण विखे पाटील; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुरस्कारांचे वितरण

राहाता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देश एकसंघपणे वाटचाल करीत असून, कोणत्याही ग्रंथापेक्षा संविधान हाच आमच्यासाठी श्रेष्ठ ग्रंथ आहे, असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेऊन या पवित्र ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केल्याचेही त्यांनी गौरवोद्गार काढले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने विविध
क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मुकुंदराव सदाफळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गोडकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, मोहनराव सदाफळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष
राजेंद्र निकाळे, उपाध्यक्ष प्रदीप बनसोडे, सचिव बाळासाहेब कोळगे, कैलास सदाफळ, नितीन कापसे, मुन्नाभाई शहा, रघुनाथ बोठे, सोपानराव सदाफळ आदी उपस्थित होते.

या प्रसंगी पत्रकार सतीश वैजापूरकर, पंकज पिपाडा, सुनील सदाफळ, प्रा. बाळासाहेब गाडेकर, माधव
बिडवे, बाळासाहेब गिधाड, हाजी बालमभाई पापाभाई सय्यद, दत्तात्रय पिलगर आणि भानुदास गाडेकर यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

मंत्री विखे पाटील म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकांसाठी कार्य करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा
विचार बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे नेला जात आहे. शोषित व वंचित घटकांसाठी पराकोटीचा संघर्ष करणाऱ्या महापुरुषांमध्ये डॉ. आंबेडकरांचे स्थान अग्रस्थानी आहे, असे मंत्री विखे पाटील म्हणाले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र निकाळे यांनी केले.





















