
*शेतकरी कुटुंबातून घडलेले लोकाभिमुख नेतृत्व – सौ. प्रभावती जनार्दन घोगरे*
(८ मार्च – जागतिक महिला दिन विशेष)
आजच्या आधुनिक काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करत आहेत. समाजकारण, राजकारण, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या कर्तृत्वाची ठसा उमटवला आहे. अशाच जिद्दी, कर्तृत्ववान आणि समाजाशी घट्ट नाळ जोडून कार्य करणाऱ्या नेतृत्वांपैकी एक नाव म्हणजे सौ. प्रभावती जनार्दन घोगरे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रभावती काकींना घरातूनच सामाजिक व राजकीय जाणीवेची प्रेरणा मिळाली. त्यांना राजकीय व सामाजिक कार्याचा समृद्ध वारसा लाभला. त्यांचे सासरे मा. आमदार स्व. चंद्रभान पाटील घोगरे हे जनतेशी घट्ट नाळ जोडून काम करणारे नेतृत्व होते, तर त्यांचे वडील स्व. शंकरनाना खर्डे यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून जनसेवेची परंपरा जपली. या दोन्ही कुटुंबांकडून मिळालेल्या संस्कारांमुळे प्रभावती काकींच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र तळमळ निर्माण झाली.
याच भावनेतून त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांचा राजकीय प्रवास लोणी खुर्द ग्रामपंचायतीपासून सुरू झाला. गावाच्या विकासासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी गावातील मूलभूत सुविधा, शिक्षण आणि विविध सामाजिक उपक्रम यावर विशेष भर दिला.

सौ. प्रभावती घोगरे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची धाडसी भूमिका आणि स्पष्टवक्तेपणा. अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवणे आणि सर्वसामान्य लोकांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले आहे. त्यामुळे अल्पावधीतच त्या आपल्या भागातील महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या.
सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रातही सक्रिय भूमिका बजावली. विविध निवडणुकांमध्ये त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. कार्यकर्त्यांशी जुळलेले नाते, लोकांशी असलेला आत्मीय संवाद आणि काम करण्याची तळमळ यामुळे त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा मिळत गेला.
लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे व खासदार निलेश लंके यांच्या प्रचारात त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क करत मतदारांपर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवला. त्याचप्रमाणे विविध सामाजिक व राजकीय आंदोलनांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात उमेदवारी स्वीकारत त्यांनी धाडसी राजकीय पाऊल टाकले. ही निवडणूक केवळ राजकीय लढत नव्हती, तर सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी आणि परिवर्तनाच्या विचारासाठी उभा राहिलेला संघर्ष होता.
राजकारण आणि समाजकारणाबरोबरच सौ. प्रभावती घोगरे या एक प्रगतिशील व कष्टाळू शेतकरी म्हणूनही ओळखल्या जातात. शेतीबरोबरच त्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दुग्ध व्यवसायही यशस्वीपणे सांभाळत आहेत. कृषी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडून सन २०१६ मध्ये “जिजामाता कृषीभूषण पुरस्कार” देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच सह्याद्री वाहिनीवर शेतकरी प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिले असून, शेतीविषयक प्रश्न मांडण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले आहे.
त्यांचे उत्तम वकृत्व हेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांना कविता, चारोळ्या आणि वात्रटिका लिहिण्याची विशेष आवड आहे. समाजातील सर्वसामान्य लोकांशी आत्मीयतेने संवाद साधणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि एक मैत्रीण म्हणून त्यांच्या भावना समजून घेणे हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा गुण आहे. त्यामुळे त्या केवळ एक राजकीय नेत्या नसून, सर्वसामान्यांच्या मनात स्थान मिळवलेले लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात.
त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. ही केवळ त्यांची वैयक्तिक उपलब्धी नसून त्यांच्या कार्यावर ठेवलेला विश्वास आणि त्यांच्या नेतृत्वाची पावती आहे.
सौ. प्रभावती घोगरे यांचा प्रवास हा खऱ्या अर्थाने संघर्ष, जिद्द आणि समाजसेवेचा प्रवास आहे. दृढ इच्छाशक्ती, लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि काम करण्याची जिद्द असेल तर महिला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम करताना एकच भावना मनात येते समाजासाठी झटणाऱ्या अशा नेतृत्वामुळेच महिलांच्या सशक्तीकरणाला खऱ्या अर्थाने बळ मिळत आहे.
त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
✍️ गौतम आहेर पा.




















