*शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – प्रभावती घोगरे*

राहाता (प्रतिनिधी) : आमदार संजय गायकवाड यांच्या कथित गुंडगिरीचा तसेच धिरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राहाता येथील तहसीलदार श्री. अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी यावेळी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या विषयी कोणतेही अवमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही. लोकप्रतिनिधींनी कायद्याचे भान ठेवून वागणे अपेक्षित असताना गुंडगिरीची भाषा वापरणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. अशा प्रवृत्तीवर तात्काळ आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.”
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ व ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत स्व. कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक, ज्याचे प्रकाशन प्रशांत आंबी यांनी केले आहे, ते निवेदनासह तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आले. तसेच या पुस्तकासंदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याचाही तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी राहाता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, शिमोन जगताप यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुरेश पानसरे, कानिफनाथ तांबे, बाबा शेख आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















