बाबांनी कमावलेली माणसे, मुलाने पूर्ण केलेले स्वप्न… राहात्याच्या काळजाला चटका लावणारी रफिक (बाबा) शहा यांची आठवण!

राहाता शहरात रफिक (बाबा) शहा यांची शोकसभा ही केवळ एका व्यक्तीच्या निधनानंतरची औपचारिक सभा नव्हती, तर ती बाबांनी आयुष्यभर कमावलेल्या सन्मानाची, प्रेमाची आणि माणुसकीची जिवंत साक्ष होती. शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेले नागरिक, व्यापारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार हेच सांगून गेले की-रफिक बाबा हे नाव म्हणजे विश्वास, निष्ठा आणि माणसे जोडण्याची कला.

फळ व्यापारी म्हणून व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या रफिक बाबांनी आपला जीवनप्रवास केवळ व्यवहारापुरता मर्यादित ठेवला नाही. त्यांनी माणसे जोडली, नाती जपली आणि शहराच्या सामाजिक-राजकीय प्रवाहात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. विखे परिवाराशी तीन पिढ्यांपासून असलेली त्यांची एकनिष्ठ नाळ ही केवळ राजकीय निष्ठा नव्हती, तर ती श्रद्धा आणि आपुलकीची होती. म्हणूनच विखे परिवाराशी निष्ठावंत असलेल्या परिवारात रफिक बाबा यांचे नाव नेहमी अग्रस्थानी राहिले.

निवडणुकीच्या निकालाच्या अवघ्या दोनदिवस आधी, शुक्रवारी मस्जिदमध्ये आलेला बाबांचा अचानक मृत्यू संपूर्ण शहराला हादरवून गेला. आपल्या मुलाचे- मुन्नाभाई शहा यांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून बाबा या जगातून निघून गेले. दोन दिवसांनी मुन्नाभाई शहा विजयी झाले, पण विजयाचा जल्लोष पाहण्यासाठी बाबा नव्हते, आणि हाच क्षण शहराच्या मनाला चटका लावणारा ठरला.

मुन्नाभाई शहा यांना विखे पाटलांकडून उमेदवारी जाहीर झाल्याचा तो क्षण रफिक बाबांसाठी अभिमानाने छाती भरून आणणारा होता. “माझ्या मुलाला संधी मिळाली” हे शब्द बाबांच्या डोळ्यांतून आणि चेहऱ्यावरच्या समाधानातून स्पष्ट उमटत होते. त्या दिवसापासून बाबा केवळ वडील राहिले नाहीत, तर प्रचारातील सर्वांत उत्साही कार्यकर्ते बनले. वय, तब्येत, थकवा काहीच त्यांच्या मार्गात अडथळा ठरले नाही. गल्ली-गल्लीत, माणसा-माणसात ते एकच वाक्य आत्मविश्वासाने बोलत होते “माझा मुलगा जिंकेल.”

मुन्नाभाई शहा जिंकले, बाबांचे स्वप्न पूर्ण झाले. राहाता नगरपरिषद निवडणुकीत ते निवडून आले. ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांनी त्यांची गटनेता म्हणून निवड केली. आज रफिक बाबा असते, तर हे सारे पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला असता ही भावना शोकसभेत उपस्थित प्रत्येकाच्या मनात होती.

रविवारी २८ डिसेंबर रोजी झालेल्या शोकसभेत लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, किशोर बोरावके, डॉ. संतोष मैड, राजेंद्र वाबळे, मौलाना यह्या, हाफिज फैज मौलाना शिर्डी ,पत्रकार राजुभाई पठाण,दिलीपभाऊ सूर्यवंशी,माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, दिलीप रोहोम, चेअरमन मुकुंद सदाफळ, दहेगाव सरपंच भगवानराव डांगे, भागवत आरणे सर, राजेंद्र निकाळे सर, माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने, सर्जेराव मते सर, तुषार सदाफळ,दशरथ गव्हाणे, संदीप दंडवते, संजय वाघमारे, दत्ता गायकवाड सर, दीपक गांधी, डॉ. किरण गोरे, डॉ. दत्ता कानडे, डॉ सौ स्वाती दत्ता कानडे,गणेश सर जाधव ( मनसे राहाता तालुका अध्यक्ष )लोढा शेठ (राहुरी), बंडू वाबळे, मौलाना अकील, राजेंद्र चौधरी, संजय गोंदकर, सतीश डेंगळे, पंकज लोढा, माजी नगरसेवक हाजी मुख्तार शहा, तौसिफ भाई,पेरू व्यापारी अन्सारभाई पठाण, हाजी हारून शेख (कोपरगाव), सोनूभाई शेख, विधिज्ञ अविनाश बोठे, मछिंद्र बनकर, मुश्ताकभाई शहा, शरीफभाई शेख ,अब्दुलभाई सय्यद,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी बाबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जीवनकार्याला सलाम केला.

रफिक (बाबा) शहा गेले, पण त्यांनी जोडलेली माणसे, रुजवलेली मूल्ये आणि मुलाच्या रूपाने साकारलेले स्वप्न हे राहाता शहराच्या स्मरणात कायम जिवंत राहणार आहे.




















